भात हे एक महत्त्वाचे अन्नधान्य पीक असून जगातील निम्म्यापेक्षा अधिक लोकांचे ते मुख्य अन्न आहे. भारतातील सर्व लोकांच्या आहारात नियमितपणे भाताचा समावेश असतो. भात ही संज्ञा भाताच्या वनस्पतीसाठी, तिच्या टरफलासहित दाण्यासाठी, तांदूळ तसेच शिजविलेल्या तांदळासाठी वापरली जाते.
देशातील प्रमुख अन्नधान्याच्या विचार केल्यास अंदाजे 23.3 टक्के इतकी क्षेत्र हे भात पिकाखाली आहे. महाराष्ट्र राज्यातील भात उत्पादकता ही सरासरीपेक्षा कमी असून, प्रती हेक्टरी उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी सुधारित जातींचा वापर करणे, कृषि विद्यापीठांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञान आणि सुधारित लागवड पद्धतीचा अवलंब करण्याची नितांत गरज व आवश्यकता आहे.
यासाठी सर्व प्रथम भात पिकाचे दर्जेदार उत्पादन घ्यावयाचे असेल तर भात पिकाचे सुधारित वाणांचा लागवडीसाठी अवलंब करणे अगत्याचे ठरते. त्यामुळे भाताचे सुधारित वाण हे कमी उंचीच्या, न लोळणारे व रासायनिक खतास उत्तम प्रतिसाद देणारे, किडींना व रोगांना कमी बळी पडणारे असणे आवश्यक आहे. तसेच पाने जाड, रुंद व उभट आणि गर्द हिरव्या रंगाची असून, कर्ब ग्रहणाचे कार्य अधिक प्रभावीपणे झाल्याने पानातील लोंबीत पळींजाचे प्रमाण कमी राहते. चुडांना प्रमाणात फुटवे येऊन कमी कालावधीत निसवतात. यामुळे भाताचे उत्पादन चांगले घेता येते. अशा उपयुक्त व महत्त्वपूर्ण भाताच्या विविध सुधारित व संकरित वाणाची सखोल माहिती प्रस्तुत लेखात खालील प्रमाणे देण्यात येत आहे.
भाताचे विकसित केलेले सुधारित वाण
रत्नागिरी –1, रत्नागिरी –2, रत्नागिरी –3, रत्नागिरी –4, रत्नागिरी –5, रत्नागिरी – 24, पनवेल – 1, पनवेल – 2, पनवेल – 3, कर्जत – 1, कर्जत – 2, कर्जत – 3, कर्जत – 4, कर्जत – 5, कर्जत – 6, कर्जत – 7, कर्जत – 8, कर्जत – 9, कर्जत – 10, जया, फुले मावळा, आंबे मोहर 157 , इंद्रायणी, भोगावती, फुले राधा, फुले आरडीएन – 6, प्रभावती (परभणी–1), संकरित भात सह्याद्री, संकरित भात सह्याद्री – 2 वाशिष्ठी, संकरित भात सह्याद्री – 3 सावित्री, संकरित भात सह्याद्री – 4 हंसा.
1) रत्नागिरी –1 (1986)
या वाणाचा कालावधी लवकर म्हणजेच 110 ते 115 दिवसाचा असून उत्पादकता 35 ते 40 क्विंटल/ हेक्टर इतकी आहे. लांब जाड दाणा, करपा रोगास मध्यम प्रतिकारक, पोह्यासाठी उत्तम वाण आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी हा वाण शिफारस करण्यात आला आहे. पावसाळा सुरु होताच बियाणे करावी.
2) रत्नागिरी –2 (1986)
या वाण उशिरा कालावधी म्हणजेच 145 ते 155 दिवसाचा असून उत्पादकता 50 क्विंटल/ हेक्टर इतकी आहे. आखूड जाड दाणा, कडा करपा रोगास साधारण प्रतिकारक असून महाराष्ट्राच्या निश्चित पाऊस असलेल्या पाणथळ जमिनीमध्ये योग्य आहे. पावसाळा सुरु होताच बियाणे करावी.
3) रत्नागिरी – 3 (1993)
या वाणाचा पक्वता कालावधी 140 ते 145 दिवस असून उत्पादकता 40 ते 45 क्विंटल/ हेक्टर इतकी आहे. हा वाण उंच खालच्या क्षेत्रासाठी योग्य गादीमाशी प्रतिकारक, लांब व जाड दाणा, पोह्यासाठी वाण उत्तम आहे. पावसाळा सुरु होताच बियाणे करावी.
4) रत्नागिरी – 4 (2009)
या वाणाचा पक्वता कालावधी मध्यम म्हणजेच 125 ते 130 दिवस असून या वाणाचे सरासरी उत्पादकता 49 क्विंटल/ हेक्टर इतकी आहे. हा वाण मध्यम मध्यम उंचीचा (100 ते 108 सेंमी) असून दाणा लांबट बारीक प्रकारचा आहे. या वाणाच्या पातीचा रंग फिकट हिरवा असून फुटव्यांची संख्या चांगली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी हा वाण शिफारस करण्यात आला आहे. पावसाळा सुरु होताच बियाणे करावी.
5) रत्नागिरी – 5 (2012)
या वाणाचा पक्वता कालावधी मध्यम म्हणजेच 115 ते 120 दिवस असून या वाणाचे सरासरी उत्पादकता 35 ते 45 क्विंटल/ हेक्टर इतकी आहे. आखूड बारीक दाणा, कडा करपा रोगास साधारण प्रतिकारक तसेच तपकिरी, तुडतुडे, पांढऱ्या पाठीचे तुडतुडे, हिरवे तुडतुडे या किडींना सहनशील आहे. हा वाण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी हा वाण शिफारस करण्यात आला आहे. पावसाळा सुरु होताच बियाणे करावी.
6) रत्नागिरी – 24 (2009)
या वाणाचा पक्वता कालावधी लवकर म्हणजेच 110 ते 115 दिवसाचा असून या वाणाचे सरासरी उत्पादकता 35 ते 40 क्विंटल/ हेक्टर इतकी आहे. हा वाण अर्ध बुटका उंच, लांब पातळ धान्य, खोडकिड्यास सहनशील आहे. खरीप व गरम हवामान दोन्हीसाठी उपयुक्त असून स्फोटांना प्रतिरोधक आणि माफक प्रमाणात, बॅक्टेरियाच्या पानांचे रोगास संवेदनाक्षम आहे.
7) पनवेल – 1 (1984)
या वाणाचा पक्वता कालावधी सरासरी 125 ते 130 दिवसात तयार होत असून वाणाचे सरासरी उत्पादकता 40– 43 क्विंटल/ हेक्टर इतकी आहे. आखूड दाणा आणि क्षार प्रतिकारक आहे. पावसाळा सुरु होताच बियाणे पेरणी करावी. या वाणाचे पीक उष्ण व दमट हवामानात चांगले येते.
8) पनवेल – 2 (1987)
या वाणाचा पक्वता कालावधी सरासरी 110 ते 115 दिवसात तयार होत असून वाणाचे सरासरी उत्पादकता 33– 41 क्विंटल/ हेक्टर इतकी आहे. लांब बारीक आणि क्षार प्रतिकारक आहे. पावसाळा सुरु होताच बियाणे पेरणी करावी. या वाणाचे पीक उष्ण व दमट हवामानात चांगले येते.
9) पनवेल – 3 (2000)
या वाणाचा पक्वता कालावधी सरासरी 125 ते 130 दिवसात तयार होत असून वाणाचे सरासरी उत्पादकता 45 ते 50 क्विंटल/ हेक्टर इतकी आहे. लांब व मध्यम जाडीचा तांदूळ आणि क्षार प्रतिकारक आहे. पावसाळा सुरु होताच बियाणे पेरणी करावी. या वाणाचे पीक उष्ण व दमट हवामानात चांगले येते.
10) कर्जत – 1 (1987)
या वाणाचा पक्वता कालावधी सरासरी 105 ते 110 दिवसात तयार होत असून वाणाचे सरासरी उत्पादकता 35 ते 45 क्विंटल/ हेक्टर इतकी आहे. हा वाण आखूड जाड दाणा, कडा करपा रोगास प्रतिकारक आहे. पावसाळा सुरु होताच बियाणे पेरणी करावी. हा वाण कोकण विभागासाठी शिफारस केला आहे.
11) कर्जत – 2 (1994)
या वाणाचा पक्वता कालावधी सरासरी 135 ते 140 दिवसात तयार होत असून वाणाचे सरासरी उत्पादकता 40 ते 45 क्विंटल/ हेक्टर इतकी आहे. हा वाण लांबट बारीक दाणा, कुरमुरे, मुरमुरेसाठी उपयुक्त आहे. पावसाळा सुरु होताच बियाणे पेरणी करावी. हा वाण कोकण विभागासाठी शिफारस केला आहे.
12) कर्जत – 3 (1994)
या वाणाचा पक्वता कालावधी सरासरी 115 ते 120 दिवसात तयार होत असून वाणाचे सरासरी उत्पादकता 40 ते 45 क्विंटल/ हेक्टर इतकी आहे. हा वाण आखूड जाड दाण्याची हळवी, भात व भाकरी पोह्यासाठी उपयुक्त आहे. पावसाळा सुरु होताच बियाणे पेरणी करावी. हा वाण कोकण विभाग व महाराष्ट्र राज्यासाठी शिफारस केला आहे.
13) कर्जत – 4 (1998)
या वाणाचा पक्वता कालावधी सरासरी 110 ते 115 दिवसात तयार होत असून वाणाचे सरासरी उत्पादकता 30 ते 35 क्विंटल/ हेक्टर इतकी आहे. या वाणाचे अतिशय बारीक तांदूळ आहे. पावसाळा सुरु होताच बियाणे पेरणी करावी. हा वाण कोकण विभाग व महाराष्ट्र राज्यासाठी शिफारस केला आहे.
14) कर्जत – 5 (2006)
या वाणाचा पक्वता कालावधी सरासरी 125 ते 130 दिवसात तयार होत असून वाणाचे सरासरी उत्पादकता 45 ते 50 क्विंटल/ हेक्टर इतकी आहे. हा वाण मध्यम उंचीचा (95 ते 100 सेंमी) असून दाणे लांबट आकाराचे असतात. या वाणाचे भारडाईचे प्रमाण 77.5 टक्के असून अख्या तांदळाचे प्रमाण 61.1 टक्के आहे. या वाणाचे उत्पादन प्रचलित जया वाणापेक्षा 10 ते 15 टक्के अधिक आहे. पावसाळा सुरु होताच बियाणे पेरणी करावी. हा वाण संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी शिफारस केला आहे.
15) कर्जत – 6 (2006)
या वाणाचा पक्वता कालावधी सरासरी 130 ते 135 दिवसात तयार होत असून वाणाचे सरासरी उत्पादकता 40 ते 45 क्विंटल/ हेक्टर इतकी आहे. हा वाण मध्यम उंचीचा (95 ते 100 सेंमी)असून दाणे लांबट आकाराचे असतात. या वाणाचे भारडाईचे प्रमाण 68 टक्के असून अख्या तांदळाचे प्रमाण 25.4 टक्के आहे. या वाणाचे उत्पादन प्रचलित वाण कर्जत – 4 पेक्षा 27.18 टक्के जास्त आहे. या वाणाची गुणवत्ता ही आंध्र प्रदेशातील सांबामसुरी या लोकप्रिय वाणासारखी आहे. पावसाळा सुरु होताच बियाणे पेरणी करावी. निश्चित पाऊस खरीप हंगाम आणि सिंचन प्रदेश असलेल्या रब्बी आणि उष्ण हवामानातील कोकण विभागात महाराष्ट्र राज्यासाठी शिफारस केला आहे.
16) कर्जत – 7 (2007)
या वाणाचा पक्वता कालावधी सरासरी 115 ते 120 दिवसात तयार होत असून वाणाचे सरासरी उत्पादकता 45 ते 50 क्विंटल/ हेक्टर इतकी आहे. हा वाण मध्यम उंचीचा (90 ते 100 सेंमी)असून न लोळणारा असून याचा दाणा लांबट बारीक आकाराचे असतात. या वाणाच्या अमायलोजचे प्रमाण मध्यम असल्यामुळे तांदूळ शिजविल्यावर भात चिकट होत नाही. या वाणाचे उत्पादन प्रचलित वाण रत्नापेक्षा 13.65 टक्के आणि कोकण विभागात 19.37 टक्के अधिक असल्यामुळे रत्ना या भात वाणास पर्यायी वाण म्हणून प्रसारित केला आहे. हा वाण भाकरी, चुरमुरे यासाठी उपयुक्त आहे. पावसाळा सुरु होताच बियाणे पेरणी करावी. निश्चित पाऊस खरीप हंगाम आणि सिंचन प्रदेश असलेल्या रब्बी आणि उष्ण हवामानातील कोकण विभागात महाराष्ट्र राज्यासाठी शिफारस केला आहे.
17) कर्जत – 8 (2008)
या वाणाचा पक्वता कालावधी सरासरी 140 ते 145 दिवसात तयार होत असून वाणाचे सरासरी उत्पादकता 45 ते 50 क्विंटल/ हेक्टर इतकी आहे. हा वाण मध्यम उंचीचा (110 ते 115 सेंमी)असून दाण्याचा आकार आखूड व बारीक आहे. पावसाळा सुरु होताच बियाणे पेरणी करावी. निश्चित पाऊस पाऊसमान असलेल्या महाराष्ट्र राज्यासाठी शिफारस केला आहे.
18) कर्जत – 9 (2014)
या वाणाचा पक्वता कालावधी सरासरी 120 ते 125 दिवसात तयार होत असून वाणाचे सरासरी उत्पादकता 45 ते 50 क्विंटल/ हेक्टर इतकी आहे. मध्यम बारीक दाणा, तांदळाची उत्तम प्रत आहे. पावसाळा सुरु होताच बियाणे पेरणी करावी. निश्चित पाऊस पाऊसमान असलेल्या महाराष्ट्र राज्यासाठी शिफारस केला आहे.
19) कर्जत – 10 (2018)
या वाणाचा पक्वता कालावधी सरासरी 140 ते 145 दिवसात तयार होत असून वाणाचे सरासरी उत्पादकता 50 ते 52 क्विंटल/ हेक्टर इतकी आहे. लांबट बारीक दाणा, तांदळाची प्रत मध्यम आहे. पावसाळा सुरु होताच बियाणे पेरणी करावी. निश्चित पाऊस पाऊसमान असलेल्या महाराष्ट्र राज्यासाठी शिफारस केला आहे.
20) जया
जया हा वाण सरासरी 135 ते 140 दिवसाच्या कालावधीत पक्व होणारा आहे. या वाणाचा तांदूळ जाड असून खोडकिडा, कडा करपा यांना रोगांना बळी पडते. या वाणाचे प्रती हेक्टरी सरासरी उत्पादकता 40 ते 45 क्विंटल इतकी आहे. हा वाण कमी प्रमाणात भात शेतीत लागवडीकरिता वापरला जातो. कारण हा वाण रोगांना जास्त प्रमाणात बळी पडतो.
21) फुले मावळा
फुले मावळा हा वाण सरासरी 125 ते 140 दिवसाच्या कालावधीत पक्व होणारा आहे. या वाणाचा तांदूळ लांबट जाड, सुवासिक असून कडा करपा रोगास प्रतिकारक आहे. या वाणाचे प्रती हेक्टरी सरासरी उत्पादकता 40 ते 50 क्विंटल इतकी आहे. हा वाण भात लागवडीकरिता मध्यम आहे.
22) आंबे मोहर 157
आंबे मोहर 157 हा वाण सरासरी 145 ते 158 दिवसाच्या कालावधीत पक्व होणारा आहे. या वाणाचा तांदूळ आखूड बारीक व सुवासिक, पीक लोळते उंच वाण असून हा वाण रोगास कमी प्रतिकारक आहे. या वाणाचे प्रती हेक्टरी सरासरी उत्पादकता 20 ते 25 क्विंटल इतकी आहे. हा वाण भात लागवडीकरिता उत्तम आहे.
23) इंद्रायणी
इंद्रायणी हा वाण सरासरी 135 ते 140 दिवसाच्या कालावधीत पक्व होणारा आहे. या वाणाचा तांदूळ बारीक व आखूड असून करपा रोगास कमी प्रतिकारक आहे. या वाणाचे प्रती हेक्टरी सरासरी उत्पादकता 30 ते 35 क्विंटल इतकी आहे. हा वाण भात लागवडीकरिता सर्वसामान्य आहे.
24) भोगावती
भोगावती हा वाण सरासरी 135 ते 140 दिवसाच्या कालावधीत पक्व होणारा आहे. या वाणाचा तांदूळ लांबट दाणा, सुवासिक, असून करपा रोगास कमी प्रतिकारक आहे. या वाणाचे प्रती हेक्टरी सरासरी उत्पादकता 35 ते 40 क्विंटल इतकी आहे. कोकण व पश्चिम घाट विभागासाठी शिफारशीत करण्यात आलेला आहे.
25) फुले राधा
फुले राधा हा वाण सरासरी 110 ते 115 दिवसाच्या कालावधीत पक्व होणारा आहे. या वाणाचा तांदूळ बारीक व दाणा आखूड असून करपा रोगास कमी प्रतिकारक आहे. या वाणाचे प्रती हेक्टरी सरासरी उत्पादकता 35 ते 40 क्विंटल इतकी आहे. हा वाण कमीत कमी दिवसात तयार होत असल्यामुळे ज्या ठिकाणी कमी पाऊसमान आहे किंवा अवर्षग्रस्त भाग आहे अशा ठिकाणी हा वाण उपयुक्त आहे.
26) फुले आरडीएन – 6
फुले आरडीएन – 6 हा वाण सरासरी 115 ते 120 दिवसाच्या कालावधीत पक्व होणारा आहे. या वाणाचा तांदूळ मध्यम आकाराचा असून कडा करपा रोगास कमी प्रतिकारक आहे. या वाणाचे प्रती हेक्टरी सरासरी उत्पादकता 35 ते 40 क्विंटल इतकी आहे. हा वाण कमीत कमी पक्व होत असल्यामुळे ज्या ठिकाणी कमी पाऊसमान आहे अशा ठिकाणी हा वाण लागवडीसाठी महत्त्वाचा आहे.
27) प्रभावती (परभणी–1)
प्रभावती (परभणी – 1) हा वाण सरासरी 125 ते 130 दिवसाच्या कालावधीत पक्व होणारा आहे. या वाणाचा तांदूळ मध्यम बुटका वाण असून पीक जमिनीवर लोळत नाही. करपा रोगास काही प्रमाणात प्रतिकारक करणारा आहे. या वाणाचे प्रती हेक्टरी सरासरी उत्पादकता 35 ते 40 क्विंटल इतकी आहे.
28) संकरित भात सह्याद्री (1998)
या वाणाचा पक्वता कालावधी सरासरी 125 ते 130 दिवसात तयार होत असून वाणाचे सरासरी उत्पादकता 60 ते 65 क्विंटल/ हेक्टर इतकी आहे. संकरित जात लांबट दाणा, कडा करपास रोगास प्रतिकारक आहे. पावसाळा सुरु होताच बियाणे पेरणी करावी. या वाणाचे पीक उष्ण व दमट हवामानात चांगले येते.
29) संकरित भात सह्याद्री – 2 वाशिष्ठी (2006)
या वाणाचा पक्वता कालावधी सरासरी 115 ते 120 दिवसात तयार होत असून वाणाचे सरासरी उत्पादकता 60 ते 66 क्विंटल/ हेक्टर इतकी आहे. संकरित जात लांबट बारीक दाणा, न लोळणारी आहे. पावसाळा सुरु होताच बियाणे पेरणी करावी. या वाणाचे पीक उष्ण व दमट हवामानात चांगले येते.
30) संकरित भात सह्याद्री – 3 सावित्री (2006)
या वाणाचा पक्वता कालावधी सरासरी 125 ते 130 दिवसात तयार होत असून वाणाचे सरासरी उत्पादकता 65 ते 75 क्विंटल/ हेक्टर इतकी आहे. संकरित जात लांबट बारीक दाणा, न लोळणारी आहे. पावसाळा सुरु होताच बियाणे पेरणी करावी. या वाणाचे पीक उष्ण व दमट हवामानात चांगले येते.
31) संकरित भात सह्याद्री – 4 हंसा (2006)
या वाणाचा पक्वता कालावधी सरासरी 115 ते 120 दिवसात तयार होत असून वाणाचे सरासरी उत्पादकता 65 ते 75 क्विंटल/ हेक्टर इतकी आहे. लांबट बारीक दाणा, कडा करपा रोगास प्रतिकारक व न लोळणारी आहे. पावसाळा सुरु होताच बियाणे पेरणी करावी. या वाणाचे पीक उष्ण व दमट हवामानात चांगले येते.
महाराष्ट्रात विशेषत: कोकण विभागात भाताची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. उच्च दर्जाचे व गुणवत्तापूर्ण भाताचे उत्पादन घेण्यासाठी भाताचे विकसित केलेल्या सुधारित व संकरित वाणांची माहिती भात उत्पादक शेतकऱ्यांना असणे क्रमप्राप्त असून त्यांना ही माहिती महत्त्वाची व उपयोगी पडू शकेल. यासाठी सदर लेख तयार करून तमाम भात उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
संदर्भ
- बी.बी.पाटील, डी.एस.थोरवे, प्रमुख पिकांचे उत्पादन व बीजोत्पादन तंत्रज्ञान, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी
- वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
- http://www.dbskkv.org/variety-release.htm
मला सह्याद्री 4 भाताच बियाण कुठे भेटल
ही सुधारीत खात्रीशिर भात बियाणी व दरपत्रक कोठे मिळतील.
जिल्हा किंवा तालुका बीज गुणांक केंद्र किंवा कृषी सेवा केंद्र अथवा विद्यापीठ मान्यताप्राप्त बियाणे भांडार या ठिकाणी भारताचे सुधारित बियाणे खात्रीशीर मिळतील.