कांदा हा मानवी आहारात व विविध पदार्थात नियमितरित्या वापरला जाणारा महत्त्वाचा घटक आहे. यामुळे देशात विशेषत: महाराष्ट्रात कांदा लागवडीस व उत्पादनात भरपूर वाव आहे. परंतु कांद्याची साठवणुकी पश्चात्त योग्य व्यवस्थापन न केल्यामुळे मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते.
वाचा : कांद्याचे योग्य वाण कसे निवडावे
प्रस्तुत लेखामध्ये आपणास कांदा साठवणुकीचे महत्त्व समजून घेता येईल. कांद्याची साठवण कशी करावी, कांद्याची निर्यात कशी केली जाते व कांदा साठवणुकीमुळे होणारे फायदे याविषयी परिपूर्ण माहिती मिळेल.
कांदा साठवणुकीचे उद्देश
- कांद्याची प्रत व गुणवत्ता उत्तम राखणे.
- कांद्याची साठवण योग्य पद्धतीने करणे.
- कांदा साठवणुकीत होणारे नुकसान कमी करणे.
- कांद्याचा साठवण कालावधी वाढविणे.
कांदा साठवणुकीचे महत्त्व
- कांद्याचे ज्या वेळेस उत्पादन वाढलेले असते त्या वेळी बाजारात कांद्याची आवक वाढून दरामध्ये घसरण होते यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान होते त्यामुळे कांदा काढणीनंतर कांद्याची साठवण योग्य पद्धतीने होणे आवश्यक असते.
- कांद्याची चांगल्या प्रकारे साठवण करून कांदा दीर्घकाळ साठवून ठेवता येतो, यामुळे बाजारात ज्या वेळेस जास्त भाव आहे यादरम्यान कांद्याची विक्री करून कांद्याचे अधिक उत्पन्न नफा वाढविता येतो.
- कांदा साठवणुकीत होणारे नुकसान टाळून जर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी योग्य व्यवस्थापन केल्यास त्यांना मिळणाऱ्या आर्थिक नफ्यात वाढ होऊ शकते.
वाचा : कांद्याचे दर्जेदार उत्पादन कसे वाढवावे
कांद्याची साठवण कशी करावी ?
- कांद्याची साधारणपणे 30 ते 40 टक्के माना पडल्यानंतर कांद्याची काढणी करावी.
- काढणीनंतर कांदा पातीसह सुकविणे, पात लांब नाळ ठेवून कापणे, प्रतवारी करणे, तो सावलीमध्ये ढीग करून सुकविणे या गोष्टी काळजीपूर्वक कराव्यात.
- कांद्याची रब्बी व उन्हाळी हंगामातील साठवण करता येते.
- साठवण केल्याने कांदा काढणीनंतर विक्री करण्याची घाई न करता हळू हळू बाजारात आणून चांगला बाजारभाव मिळण्याची शक्यता वाढते.
- कांदा उत्पादन न होणाऱ्या कालावधीत कांद्याचा पुरवठा सतत राहून उपलब्धता वाढते.
- कांद्याची साठवणी नाशिक व पुणे भागात मोठ्या प्रमाणात करतात. साठवणीसाठी एन 2-4-1, ॲग्रीफाउंड लाईट रेड ह्यांसारख्या वाणांची निवड करावी.
- साठवणीसाठी निवडलेले कांदे शेतात आणि सावलीत चांगले वाळवलेले व निवड, प्रतवारी केलेले असावेत. त्यांना 3-4 सेंमी. देठ ठेवावेत.
- साठवण हवा खेळती राहील अशा अरुंद चाळीमध्ये ठेवतात. कांद्याचे सूर्यप्रकाश व पाऊस ह्यांपासून रक्षण करता येईल व चाळीमध्ये तापमान, आर्द्रता कमी राहील याची दक्षता घ्यावी.
- कांदे साठवणीपूर्वी चाळी निर्जंतूक करून घ्याव्या म्हणजे कांदे सडण्याचे प्रमाण कमी होते.
- साठवणीमध्ये कालावधीला अनुसरून मोड येणे, सडणे, वजनातील घट ह्या प्रकारे 3-4 महिन्यांच्या कालावधीत 15-20 टक्केपर्यंत नुकसान होते.
- पारंपरिक चाळींमध्ये नुकसान जास्त होते.
- मोड येण्यास प्रतिबंध करण्यासाठी विकिरण प्रक्रियेचा वापर करता येतो.
- साठवलेले कांदे चाळीतून काढल्यावर चाळी परत निर्जंतूक करून घ्याव्यात.
वाचा : काढणीपूर्वी कांद्याची प्रक्रिया कशी करावी
कांद्याची निर्यात कशी केली जाते ?
- भारतातून कांदा मोठ्या प्रमाणावर निर्यात होतो. महाराष्ट्रातील नाशिक आणि पुणे जिल्ह्यांचा कांदा निर्यातीमध्ये फार मोठा सहभाग आहे. वर्षभर कांद्याची निर्यात आखाती देश, मलेशिया, सिंगापूर, श्रीलंका, मॉरिशस, इत्यादी ठिकाणी होते.
- निर्यातीसाठी निवड, प्रतवारी केलेला मध्यम ते मोठ्या आकाराचा कांदा लहान पिशव्यांमध्ये पॅकिंग करून सागरी मार्गाने पाठविला जातो.
- महाराष्ट्राव्यतिरिक्त कर्नाटकमधील लहान गुलाबी कांदा, आंध्रामधील कृष्णपुरम लहान कांदा, नाटू कांदा आणि तामीळनाडूमधील पोडीसू आणि मटलोर कांदा ह्या प्रकारच्या कांद्याची निर्यात मोठ्या प्रमाणावर मलेशिया आणि सिंगापूर येथे करण्यात येते.
- अलीकडेच युरोपियन देशांना पिवळ्या कांद्याची निर्यात करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. प्रक्रिया केलेल्या पांढऱ्या कांद्याची देखील निर्यात करण्यात येते. भारतामधून कांद्याच्या निर्यातीस भरपूर वाव आहे.
कांदा साठवणुकीमुळे होणारे फायदे
- कांद्याची प्रत व गुणवत्ता उत्तम राखता येते.
- कांद्याची साठवण योग्य पद्धतीने करता येते.
- कांदा साठवणुकीत होणारे नुकसान कमी करता येते.
- कांद्याचा साठवण कालावधी वाढविता येतो.
- बाजारात कांद्यांना चांगला दर मिळतो.
- कांद्यापासून मिळणाऱ्या एकूण उत्पन्न नफ्यात वाढ होते.
कांद्याची साठवण कशी करावी हा लेख आपणास आवडला असल्यास Subscribe, लाईक, कंमेट्स आणि शेअर करून सहकार्य करावे. ज्यामुळे आणखीन इतर उपयुक्त लेख तयार करण्यास लेखकाला प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल.