पालक ही अतिशय लोकप्रिय पालेभाजी असून भारतातील सर्वच राज्यांत विशेषत: महारष्ट्रात या भाजीपाला पिकाची लागवड वर्षभर करतात. तसेच ह्या भाजीला सतत मागणी असते. विशेष म्हणजे या भाजीचे उगमस्थान भारत व चीन हे प्रदेश आहेत असे शास्त्रज्ञांचे मत आहे. पालकातील पोषणमूल्ये लक्षात घेता याची लागवड मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक आहे. उत्तर भारतात या भाजीची लागवड फार मोठ्या प्रमाणात होते. महाराष्ट्रातही मोठ्या शहरांच्या आसपास पालकाची लागवड जवळजवळ वर्षभर केली जाते.
प्रस्तुत पालक उत्पादन तंत्रज्ञान या लेखामध्ये आपणास पालक पिकाचे महत्त्व समजून घेता येईल. पालक या भाजीपाला पिकाची व्यापारी तत्त्वावर लागवड कशी करावी, पालक पिकाचे उन्नत वाण, खत व पाणी व्यवस्थापन, महत्त्वाच्या किडी आणि रोगांची माहिती मिळेल, पालक काढणी पाश्चात व्यवस्थापन व विक्री या संबंधी सखोल माहिती मिळेल.
पालक पिकाचे महत्त्व
पालकाच्या भाजीत ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतात. तसेच प्रथिने (प्रोटीन्स) आणि चुना (कॅल्शियम), लोह, फॉस्फरस, इत्यादी खनिजे भरपूर प्रमाणात असतात. पालकाचा उपयोग भाजी, आमटी, सूप, भजी इत्यादींमध्ये करतात. पालकाची भाजी काही प्रमाणात सारक आहे. यामुळे मानवी आहारात पालक पिकाचा समावेश प्राधान्याने केला जातो.
हवामान आणि जमीन कसे असावे ?
पालक हे कमी दिवसांत तयार होणारे हिवाळी पीक असल्यामुळे महाराष्ट्रात कडक उन्हाळ्याचे 1-2 महिने वगळून वर्षभर पालकाची लागवड करता येते. थंड हवामानात पालकाचे उत्पादन जास्त येऊन दर्जा चांगला राहतो; तर तापमान वाढवल्यास पीक लवकर फुलोऱ्यावर येते आणि दर्जा खालावतो. पालकाचे पीक विविध प्रकारच्या जमिनींत घेता येते. खारवट जमिनीतही पालकाचे पीक चांगले येऊ शकते. हलक्या जमिनीत पीक चांगले येते. ज्या खारवट जमिनीत इतर पिके येऊ शकत नाहीत तेथे पालक घेता येतो. महाराष्ट्रात सुमारे 1,400 हेक्टर क्षेत्रावर पालकाची लागवड केली जाते.
पालक पिकाचे कोणते वाण वापरावे ?
पालकाचे अनेक स्थानिक वाण असून त्यांचा वापर निरनिराळ्या भागांत करतात. पालकाचे काही सुधारित वाण पुढीलप्रमाणे आहेत.
1) ऑलग्रीन : पालकाची हा वाण भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली येथे विकसित करण्यात आला आहे.या वाणाची पाने सारख्या आकाराची, कोवळी आणि हिरवी असतात. या जातीचे उत्पादन हेक्टरी 12.5 टन इतके येते. हिवाळी हंगामातील लागवडीत 15 ते 18 दिवसांच्या अंतराने 3-7 वेळा पानांची कापणी करता येते. तसेच बियाण्याचे उत्पादन हेक्टरी सुमारे 8-10 क्विंटल मिळते.
2) पुसा ज्योती : पालकाचा हा नवीन वाण निवड पद्धतीने भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली येथे विकसित करण्यात आला आहे. या वाणाची पाने मोठी, जाड, लुसलुशीत, कोवळी ज्योतीच्या आकाराची असून त्यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, सोडियम, लोह आणि ‘क’ जीवनसत्त्वाचे प्रमाण ऑलग्रीन या वाणापेक्षा जास्त असते. हा वाण लवकर फुलावर येत नाही आणि हिवाळ्यात 8-10 कापण्या मिळतात. महाराष्ट्रात हा वाण चांगल्या प्रकारे येतो. या वाणाच्या पानांचे उत्पादन हेक्टरी 15 टनांपर्यंत मिळते. बियाण्याचे उत्पादन हेक्टरी 10-12 क्विंटल मिळते.
3) पुसा हरित : हा वाण भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली येथे विकसित करण्यात आला आहे. हा वाण जोमदार उभट वाढतो. या वाणाची पाने हिरवी, लुसलुशीत, जाड आणि भरपूर मोठ्या प्रमाणावर येतात. या वाणाच्या पानांच्या 3-4 कापण्या मिळतात आणि हा वाण लवकर फुलावर येत नाही. ह्या जातीची लागवड सप्टेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत करता येते. या वाणाचे उत्पादन हेक्टरी 10 टनांपर्यंत मिळते.
4) जॉबनेर ग्रीन : हा वाण राजस्थानमध्ये स्थानिक वाणांतून निवड पद्धतीने विकसित करण्यात आला आहे. पाने मोठी, जाड, कोवळी लुसलुशीत असतात. पानाला उग्र वास असून उत्पादन जास्त मिळते.
पालक लागवड कोणत्या हंगामात करावी ?
महाराष्ट्रातील हवामानात पालकाची लागवड जवळजवळ वर्षभर करता येते. खरीप हंगामातील लागवड जून-जुलै आणि रब्बी हंगामातील लागवड सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये केली जाते. भाजीचा सतत पुरवठा होण्यासाठी 10-15 दिवसांच्या अंतराने हप्त्या-हप्त्याने बियांण्याची पेरणी करावी.
बियाण्याचे प्रमाण किती वापरावे ?
एक हेक्टर क्षेत्रासाठी 25-30 किलो बियाणे लागते. पालकाचे आंतरपीक घेतल्यास बियाण्याचे प्रमाण कमी लागते.
पालक लागवड कशी करावी ?
- पालक हे कमी दिवसांत तयार होणारे पीक असल्यामुळे जमिनीच्या मगदुरानुसार योग्य आकाराचे सपाट वाफे तयार करून बी फोकून पेरावे आणि नंतर बी मातीत मिसळून हलके पाणी द्यावे. जमीन भारी असल्यास वाफसा आल्यावरच पेरणी करावी.
- बी ओळीत पेरताना दोन ओळींत 25-30 सेंटिमीटर अंतर ठेवावे. फार दाट लागवड केल्यास पिकाची वाढ कमजोर होऊन पानांचा आकार लहान राहतो आणि पिकांचा दर्जा खालावतो. लागवडीपूर्वी बियाण्याला थायरम या बुरशीनाशकाची 2 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात प्रक्रिया करावी. त्यामुळे मर रोगाला प्रतिबंध होतो.
पालक पिकास खते आणि पाणी व्यवस्थापन कसे करावे ?
पालक हे कमी कालावधीचे पीक असले तरी हिरव्या टवटवीत पानांवर पिकाचे उत्पादन व प्रत अवलंबून असल्यामुळे पालकाच्या पिकाला नत्राचा मोठ्या प्रमाणावर वापर करावा लागतो तसेच पिकाला पाण्याचा नियमित पुरवठा करून जमिनीत ओलावा राखणे आवश्यक आहे.
पालकाच्या पिकाला जमिनीच्या मगदुरानुसार हेक्टरी 20 गाड्या शेणखत, 150 किलो नत्र, 80 किलो स्फुरद आणि 80 किलो पालाश द्यावे. शेणखत पूर्वमशागतीच्या वेळी जमिनीत मिसळून द्यावे. संपूर्ण स्फुरद आणि पालाश आणि एकतृतीयांश नत्र पेरणीच्या वेळी द्यावे. उरलेले नत्र 2 समान भागांत विभागून पहिल्या आणि दुसऱ्या कापणीच्या वेळी द्यावे. ज्या वाणांमध्ये दोनपेक्षा जास्त कापण्या करता येतात तेथे प्रत्येक कापणीनंतर हेक्टरी 20 किलो नत्र द्यावे.
पालक पिकास पाणी व्यवस्थापन कसे करावे ?
पानांतील हिरवेपणा अधिक चांगला येऊन उत्पादन वाढविण्यासाठी बी उगवून आल्यानंतर 15 दिवसांनी आणि प्रत्येक कापणीनंतर 1.5 % युरिया फवारावा. बियांच्या पेरणीनंतर लगेच पाणी द्यावे. वाफसा आल्यानंतर पेरणी करावी. त्यामुळे बियांची उगवण चांगली होते. त्यानंतर पिकाला नियमित पाणी द्यावे. हिवाळ्यात पालकाच्या पिकाला 10-12 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. काढणीच्या 2-3 दिवस आधी पिकाला पाणी द्यावे. त्यामुळे पाने टवटववीत राहून पिकांचा दर्जा सुधारतो. आवश्यकतेनुसार तणांचे नियंत्रण खुरपणी करून करावे.
पालक पिकावरील महत्त्वाच्या किडी, रोग आणि त्यांचे नियंत्रण
पालकावर मावा व पाने कुरतडणारी अळी आणि भुंगेरे ह्यांचा उपद्रव होतो. या किडींच्या नियंत्रणासाठी पीक लहान असतानाच 10 लीटर पाणात 15 मिली. एन्डोसल्फॉन किंवा 10 मिली. मॅलेथिऑन मिसळून 8 -10 दिवसांच्या अंतराने फवारावे. काढणीच्या 810 दिवस आधी फवारणी करू नये.
पालकावर मर रोग, पानांवरील ठिपके, तांबेरा आणि केवडा या रोगांचा प्रार्दुभाव होतो. मर रोगामुळे उगवण झाल्यावर रोपांची मर होण्यास सुरुवात होते. या रोगाच्या नियंत्रणासाठी पाण्याचा योग्य निचरा करावा आणि पेरणीपूर्वी बियाण्यावर थायरम या बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. हवेतील आर्द्रता वाढल्यास पानांवर गोल करड्या रंगाचे, बांगडीच्या आकाराचे ठिपके पडतात. या बुरशीजन्य रोगामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.
या रोगाच्या नियंत्रणासाठी ताम्रयुक्त बुरशीनाशकाची उदाहरणार्थ, ब्लायटॉक्स किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 10 लीटर पाण्यात 20 ग्रॅम या प्रमाणात मिसळून फवारणी करावी. केवडा आणि तांबेरा रोगांचा फारसा उपद्रव होत नाही आणि शेतातील ओलावा नियंत्रित ठेवल्यास या रोगांना आळा बसतो. तसेच गंधकयुक्त वेटासुल, सल्फेक्स, इत्यादी आणि ताम्रयुक्त ब्लायटॉक्स या बुरशीनाशकांची फवारणी केल्यास या रोगाचे नियंत्रण होते.
पालक पिकाची काढणी कशी करावी ?
पालक पेरणीनंतर सुमारे 1 महिन्याने कापणीला तयार होतो. पालकाची पूर्ण वाढलेली हिरवी कोवळी पाने 15-30 सेंटिमीटर उंचीची झाल्यावर पानांच्या देठाचा जमिनीपासून 5 ते 7.5 सेंटिमीटर भाग ठेवून वरील भाग खुडून अथवा कापून घ्यावा आणि पानांच्या जुड्या बांधाव्यात. त्यानंतर दर 15 दिवसांच्या अंतराने जातीनुसार 3 – 4 किंवा त्यापेक्षा जास्त खुडे करावेत. कापणी करतानाच खराब पाने वेगळी काढून जुड्या बांधाव्यात.
उत्पादन किती मिळते ?
पालक पिकाचे सर्वसाधारणपणे हेक्टरी 10-15 टन एवढे उत्पादन मिळते. शिवाय बियाण्याचे उत्पादन 1.5 टनांपर्यंत मिळू शकते.
विक्री व्यवस्थापन कसे करावे ?
काढणीनंतर पालक लगेच बाजारात पाठवावा. जुड्या उघड्या जागेत रचून वरून झाकून घेऊन किंवा बांबूच्या टोपल्यांमध्ये अगर पोत्यांमध्ये व्यवस्थित रचून भरून विक्रीसाठी पाठवाव्यात. टोपलीच्या खाली आणि वर कडूनिंबाचा पाला ठेवल्यास पालक लवकर खराब होत नाही. वाहतुकीत जुड्यांवर अधूनमधून थंड पाणी शिंपडल्यामुळे पानांचा तजेलदारपणा टिकून राहतो. मात्र पाणी जास्त झाल्यास सडण्याची क्रिया सुरू होते. म्हणून जुड्यांवर जास्त प्रमाणात पाणी मारू नये. पालकाचे उत्पादन पिकाच्या लागवडीची वेळ, जात, खुडे आणि पिकाची योग्य काळजी ह्यांवर अवलंबून असते.
बीजोत्पादन कसे करावे
बीजोत्पादनासाठी पालकाची लागवड ओळीत 25 ते 30 सेंमी. अंतरावर करावी. दोन वाणांमध्ये 800 मीटर इतके विलगीकरण अंतर पायाभूत बियाण्याच्या बीजोत्पादनासाठी; तर 400 मीटर प्रमाणित बियाण्याच्या उत्पादनास आवश्यक आहे. वाणानुसार 150 ते 180 दिवसांत बी तयार होते. बी तयार झाल्यावर कापणी करून वाळल्यावर काठीने झोडपून मळणी करावी. बियाण्यात पाण्याचे प्रमाण 8-9 टक्के राहील इतके सुकवावे
पालक हे एक महत्त्वाचे भाजीपाला पीक आहे. पालकाच्या भाजीला वर्षभर मागणी असल्यामुळे पालकाची लागवड वर्षभर करण्यास वाव आहे. हिवाळी हंगामात पालकाचे पीक चांगले येते. खरीप हंगामात जून-जुलै आणि हिवाळी हंगामात सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये पालकाची लागवड करावी. पालकाचे ऑलग्रीन, पुसा ज्योती, पुसाहरित आणि जॉबनेर ग्रीन हे सुधारित वाण आहेत. पालकाची लागवड सपाट वाफ्यात 25-30 सेंटिमीटर अंतरावर करावी. पालकाच्या पिकाला हेक्टरी 20 गाड्या शेणखत, 150 किलो नत्र, 80 किलो स्फुरद आणि 80 किलो पालाश द्यावे. पिकाला नियमित पाणी द्यावे. पालकाच्या भाजी पिकाचे हेक्टरी 10-15 टन इतके उत्पादन मिळते. तर बीजोत्पादन हेक्टरी 6-8 क्विंटल मिळते.
पालक उत्पादन तंत्रज्ञान हा लेख आपणास आवडला असल्यास जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करावा. नवीन पोस्टची चालू अप्डेट ई-मेल किंवा Push Notification द्वारे मिळविण्यासाठी Modern Agrotech ला सब्सक्राईब करावे.